रस्ता देता का रस्ता?, कडाक्याच्या थंडीत ७३ वर्षीय शेतकऱ्याचे उपोषण
रस्ता देता का रस्ता?, कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचे उपोषण
अतिक्रमणामुळे गेल्या नऊ वर्षापासून शेती पडीक
शेतीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याकरिता ७३ वर्षीय पांडुरंग वानखडे यांचे आमरण उपोषण
प्रतिनिधी मूर्तिजापूर:
तालुक्यातील ग्राम सालतवाडा येथील रहिवासी माजी सरपंच राजाराम वानखडे यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यावर २०१५ सालापासून शौचालय बांधून शेताचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. याबाबत गेल्या नऊ वर्षापासून ते निवेदन, तक्रारी देत असून याबाबत दखल घेतल्या जात नाही. विविध कार्यालयाच्या उंबरठे झिजवून मेताकुठीस आले आहे. त्यामुळे ७३ वर्षीय राजाराम वानखडे यांनी आज दि.१२ पासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी यापूर्वी दि.०८/१२/२०२३ ला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती.परंतु तेव्हा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु त्याला आता दोन महिने उलटून गेल्यावर देखील कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दि.१२ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दि.७/०२/२०२४ रोजी दिला होता. त्यानुसार आज पासून त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.जीविताचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार राहतील असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी दि.१७/०२/२०२१ ला सदर अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते. परंतु त्यानंतर पुन्हा सहा महिन्यानंतर बांधकाम करण्यात आल्याने नियम व कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर नऊ वर्षापासून शेत जमीन पेरणी करता आलेली नाही.त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी देखील वानखडे यांनी केली आहे.
Advt.