केव्हाही यावे !! कोण विचारणार ?
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात कर्मचारी उशीराने पोचतात.
नविन तहसीलदार रुजू होण्याच्या दिवशी सुद्धा अनेक अधिकारी/कर्मचारी गैरहजर
श्याम ठक
बार्शीटाकळी:
बार्शीटाकळी तहसिल कार्यालयात कर्मचारी/अधिकारी नियमितपणे वेळेवर हजर राहत नसल्याची घटना वारंवार घडून येत आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या पाच दिवसाच्या आठवड्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. नागरिकांची कामे वेळेवर व्हावी तसेच कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यतत्पर राहण्यासाठी आठवड्यात दोन दिवस सुट्टी दिलेली आहे. परंतु सलग पाच दिवसात सकाळी ९:४५ ते सायंकाळी ०५:४५ पर्यंत कर्मचारी/अधिकारी यांनी कार्यरत रहावे अशी अपेक्षा असतांनाच ,बार्शीटाकळी तहसील कार्यालय ह्याला अपवाद ठरत आहे. ईतरही कार्यालयात सर्वच काही ठिकठाक आहे असेही बिलकुल नाही.. विविध कार्यालयांची पाहणी केल्यानंतर अजूनही बरेच काही उजेडात येइल. आज दि. १२ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी सकाळी १०:४० ते ११ :०० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालय बार्शीटाकळी येथे आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. बहुतांश कर्मचारी/अधिकारी यावेळेपर्यंत कर्तव्यावर पोचलेले नव्हते.. आज दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी रुजू होण्यासाठी आलेले तहसीलदार , निवासी नायब तहसीलदार व निवडणूक विभागासह रेकॉर्ड विभागातील दोन ,आस्थापना विभागातील २ ,शिपाई ,वाहन चालक वगळता ईतर ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळाला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना कळविलेले आहे. ते याबाबत काय उपाययोजना करतात हे पाहणे औत्स्तुक्याचे ठरेल. तसेच नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदारांना सुद्धा लेट लतीफ कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी सांगावे लागेल. कारण दि.०८ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी सुद्धा दहा वाजून गेल्यावर सुद्धा एक शिपाई सोडले तर कुणीही कर्तव्यावर पोचलेले नव्हते ..त्याबाबत दै. पुण्यनगरीमध्ये दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी वृत्त प्रकाशित झाले होते. परंतु त्या वृत्ताची शाई वाळते न वाळते ,पुन्हा दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:४० वाजेपर्यंत बोटावर मोजता येईल इतकेच अधिकारी/कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले.
चौकट
सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे व वेळ संपल्यावर कार्यालय सोडणे बंधनकारक आहे.यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
अविनाश शिंगटे
तहसीलदार,बार्शीटाकळी
- चौकट
ह्या कार्यालयात बाहेरील व्यक्तींचा मुक्तपणे वावर वाढतच चालला आहे. त्यांच्या मार्फत येणाऱ्या फाईल्स सहजपणे मंजूर केल्या जात आहेत. तसेच सेतु केंद्रावर सुद्धा तहसीलदार यांचे ध्यान असावे . सेतु केंद्र ज्या ठिकाणी मंजुर झालेले आहे त्याठिकाणी कार्यरत असावे असा नियम असतांना तालुक्याच्या ठिकाणी ,ग्रामीण परवाना असलेले सेतु बिनबोभाटपणे सुरु आहेत.. मुळ मालकाला मंजूर झालेला सेतु त्यांनी भाड्याने चालवायला दिला आहे. याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. एकंदरीतच तहसिल कार्यालय व त्याच्या अंतर्गत येणाऱ्या बाबींकडे विशेष लक्ष देण्यात यावे . कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी आदेश देण्यात यावे . अप डाऊन करत असल्यामुळे बहुतांश कर्मचारी वेळेवर पोचत नाहीत.
गोपाल ढोरे
बार्शीटाकळी,युवक कॉंग्रेस अध्यक्ष ( मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ)